Education News: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. बारावीच्या परिक्षेदरम्यान, रावेरमधील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यात शिक्षण विभागाकडून कॉफीची कारवाई निरंक दाखवण्यात आली आहे. प्रशासनाच्या या कृत्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती आशी की, बारावीच्या परिक्षेदरम्यान भरारी पथकाने रावेर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अचानक तपासणी केली. यावेळी पथकाला तब्बल 11 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले होते. पथकाने या या प्रकरणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून तशी माहिती केंद्र संचालकांकडे सोपवली होती.
बोर्डाला ठेवले आंधारात
पथकाने कॉपी करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांवर कारवाई करत कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करत माहिती केंद्र संचालकाकडे सोपविली होती. नियमानुसार, ही माहिती तातडीने बोर्डाकडे जाणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाल्याचे दिसत नाही. या उलट भरारी पथकाच्या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत नाशिक बोर्डाच्यावतीने जिल्ह्याचा सुधारित अहवाल प्रसिद्ध झाला. यात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी केस झाली नसल्याचे (निरंक) नमूद करण्यात आले. त्यामुळे भरारी पथकाने केलेल्या कारवाईचे काय झाले? कागदपत्रे अडीच तासांत गायब झालीच कशी? असे एक न अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. केंद्र संचालकांनी बोर्डाची दिशाभूल केली की बोर्ड स्तरावर काही गौडबंगाल झाले, या बाबात शंका उपस्थित होत आहे.
सीईओंनी घेतली दखल
दरम्यान, गंभीर अशा या प्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दखल घेतली आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती वरिष्ठांपर्यंत का पोहोचवली नाही आणि अहवाल निरंक कसा दाखविला. याबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. यात कोणी दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.








