Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कर्जमाफी संदर्भात ही बातमी असून कृषीमंत्री दत्तात्र्यय भरणे यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यानुसार, शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे. सध्या माहिती संकलनाचे काम सुरू असून, एप्रिलपूर्वी माहिती उपलब्ध होणार आहे. परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येईल. त्यानंतर, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल, असं कृषीमंत्री दत्तात्र्यय भरणे यांनी म्हटलं आहे. कृषीमंत्र्यांच्या या महितीनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाविषयी बोलताना ते म्हणले की, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी भावना पक्षातील आमदारांची आहे. असं असलं, तरी तेराव्या दिवसानंतरच सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून निर्णय घेतील. सध्या पवार कुटुंब दुःखात आहे. तेरा दिवस पूर्ण होईपर्यंत या विषयावर चर्चा करणे योग्य नाही. त्यानंतर सर्वांच्या भावना ऐकून निर्णय होईल. सुनेत्रा पवार यांच्या सोबतच्या भेटीत कोणताही राजकीय विषय झाला नसून, केवळ अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी राज्य, देश आणि पक्षाची जबाबदारी सांभाळावी. याबाबत कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्वांच्या भावना ऐकून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका दत्तात्र्यय भरणे यांनी बारामती येथे स्पष्ट केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. शेतकरी कर्जमुक्तीबाबत अर्थसंकल्पात मर्यादित तरतूद होऊ शकते. मात्र, दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल,’ असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)









