जळगाव : शहरातील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल आता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.महानगरपालिका हद्दीतील महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा मृत्यू ओढवल्यास, संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाइकांना महापालिकेकडून आर्थिक मोबदला नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने जखमी व्यक्ती व मृताच्या वारसांकडून आवश्यक त्या पुराव्यासह माहिती मागविली आहे.
उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेतील नवव्या मजल्यावर शहर अभियंता यांच्याकडे अर्ज सर्व आवश्यक पुराव्यांसह सादर करावा लागणार आहे.
या निर्णयामुळे रस्ते देखभालीबाबत महापालिकेवरही आता मोठी जबाबदारी आली असून, अपघातातील जखमी तसेच मृताचे कुटुंबीय व नागरिकांना यामुळे कायदेशीर आधार मिळाला आहे.
कशी असेल प्रक्रिया?
नागरिकांनी सादर केलेल्या अर्जाची छाननीसाठी एक विशेष समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती प्राप्त अर्जाची आणि पुराव्यांची पडताळणी करेल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करून संबंधित व्यक्तीला किंवा त्यांच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाईल. खड्यांमुळे होणाऱ्या अपघातात नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र नागरिकांनी पुराव्यानिशी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी केले आहे.









