जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उद्या मंगळवारी (दि.10 फेब्रुवारी) पासून 12वी तर दि. 20 फेब्रुवारीपासून 10 वीच्या परिक्षा सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने व प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
काय आहे पालकमंत्र्यांचा संदेश?
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा भक्कम पाया आहे. आगामी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय, निर्धास्तपणे व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.
माझ्यासह जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहे. भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे.
शिक्षण हे केवळ गुण मिळविण्याचे साधन नसून, ते व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्नांतून यश संपादन करावे.
विद्यार्थ्यांना सकारात्मक व सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच त्यांच्या मानसिक तयारीला योग्य दिशा मिळावी, यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.
आगामी परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सज्ज असून, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व शिस्त अबाधित राहील, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची शैक्षणिक प्रतिमा अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक व न्याय्य मार्गाने शिक्षण व्यवस्थेला बळ देऊया, असे आवाहन करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.








