Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवारी (दि.२८ जानेवारी ) सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह सर्व पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती तालुक्यात विविध सभांना संबोधित करणार होते. त्यानुसार ते आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते.
अन् काही क्षणात विमानाने घेतला पेट
सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला.
बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र या दुर्दैवी घटनेत अजित पवार यांच्यासह सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पुष्टी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस बारामतीला रवाना
या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. खासदार सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार दिल्लीहून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बारामतीकडे प्रस्थान केले असल्याची माहिती समोर आली आहे.










