धुळे : सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्व राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास हजारे यांनी आपल्या समर्थकांसह पालकमंत्री रावल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हजारेंचा प्रदीर्घ अनुभव भाजपाची ताकद बनेल – मंत्री रावल
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व धुळे नगरपालिका आणि महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कैलास हजारे यांना समाजकारणासह राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. श्री. हजारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांचा हा प्रदीर्घ अनुभव भारतीय जनता पक्षाची ताकद बनेल, असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास हजारे यांनी शुक्रवारी (ता. ९) आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह पालकमंत्री रावल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री रावल यांनी त्यांच्यासह समर्थकांचे स्वागत केले, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार अनुपभय्या अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, सुनील कपिल, यशवंत येवलेकर, माजी नगरसेवक भगवान गवळी, कमलेश देवरे, प्रफुल्ल पाटील, संभाजी राजपूत, नितीन लिंगायत, अमित दुसाने आदी उपस्थित होते.
हजारेंच्या अनुभवाचा पक्षाला होईल लाभ – आमदार अग्रवाल
धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमदेवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा आणि प्रतिसाद लाभत आहे. पक्षाचे सर्वच नेते, पदाधिकारी ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन तसेच प्रचार फेरी काढून भाजपचा विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडत आहेत.
गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि पुढील पाच वर्षांत केल्या जाणाऱ्या विकासकामांची मांडणी करत भारतीय जनता पक्ष जनतेसमोर जात आहे. यामुळे विरोधी पक्षांतील अनेक नेते, ज्येष्ठ पदाधिकारीही या विकासाला साथ देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक कैलास हजारे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये आले. त्यांच्या या अनुभवाचा पक्षाला नक्कीच लाभ होईल, असे मत आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केले.
भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणार, हजारेंची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम नेतृत्वात भारतीय जनता पक्ष राज्यासह देशाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कार्यात आता आम्हीही सामील होण्याचा निर्णय घेत पक्षात प्रवेश करत आहोत. येत्या १५ जानेवारीला होत असलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्नशील राहू, जनतेत भाजपची ध्येयधोरणे पोहोचवून विकासाच्या मुद्यावर मते मागू, अशी ग्वाही श्री. हजारे यांनी दिली.









