Manmad-Indore Railway : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी जमिनी संपादित करण्याच्या प्रक्रियेला धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी संघटित विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित रेल्वे लाईनमुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोलाने घेतल्या जात असल्याचा आरोप करत, जोपर्यंत न्याय्य मोबदला आणि लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मोजणीसाठी एकाही सरकारी कर्मचाऱ्याला शेतात पाऊल ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
यासंदर्भात ‘बाधित शेतकरी संघर्ष समिती’ने प्रांताधिकारी रोहन कुवर यांची भेट घेऊन निवेदन दिले. बाळापूर ते पुरमेपाडा दरम्यान टाकण्यात येणाऱ्या या रेल्वे लाईनमुळे धुळे तालुक्यातील बाळापूर, वडजाई, पिंपरी, सावळदे, अवधान, लळींग, राणमाळ, आर्वी आणि पुरमेपाडा या नऊ गावांमधील शेती बाधित होणार आहे. या भागातील जमीन अत्यंत सुपीक आणि बागायती असून, तीच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे.
रेल्वे मार्गामुळे या जमिनींचे तुकडे पडणार असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. तत्काळ प्रश्न सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेड्डू असा इशारा दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- क्षेत्रफळानुसार दरः मोबदला हेक्टरी न देता प्रति चौरस मीटरने देण्यात यावा.
- मोबदल्याची पद्धत ‘वन टाइम सेटलमेंट’ नुसार समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर असावी.
- राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ साठी २०१४ मध्ये ८००० रुपये प्रति चौ.मी. दराने मोबदला दिला होता, त्याच धर्तीवर या रेल्वे मार्गासाठीही मोबदला मिळावा.
- प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी आणि सर्वांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे.
- केंद्र सरकारच्या २०१३ च्या भूसंपादन कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन व्हावे.








