IND vs PAK : पाकिस्तानने भारताविरुद्धच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आपल्या बहुप्रतीक्षित ग्रुप लीग सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बुधवारी या निर्णयाचा पुनरुच्चार केला. यामुळे भारत-पाकिस्तान सामना होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले असून, आता आयसीसी काय निर्णय घेते, याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
काय म्हणाले शहबाज शरीफ?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की भारतासोबत सामना न खेळण्याचा निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेण्यात आला आहे. खेळाच्या मैदानावर राजकारण होऊ देऊ नये. आम्ही बांगलादेशच्या बाजूने आहोत आणि हा योग्य निर्णय आहे.
दुसरीकडे मात्र, पाकिस्तान सरकारने 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघाच्या सहभागाला हिरवा कंदील दाखवला आहे.
पाकिस्तान सरकारच्या अधिकृत निवेदनातून समोर आलेला हा निर्णय बांगलादेशला स्पर्धेतून वगळल्याच्या निषेधार्थ केलेला एक राजकीय विरोध मानला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयावर आयसीसीकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाचा थरार
7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार असून, पहिल्या दिवशी तीन सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकाता वा कोलंबो येथे तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी मुंबईत होईल. अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद वा कोलंबो येथे होईल.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 703038505 या क्रमांकवर पाठवावी.)










