जळगाव : दहा वर्ष मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम केलेल्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. १०वी -१२वीच्या परीक्षांमुळे दोन महिन्यांसाठी मॅपिंगचे काम स्थगित करावे. ज्या शिक्षकांना टीईटी/ सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, त्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी डॉ. आर. डी. कोळी यांच्यासह सुनील पवार, एस. डी. राजपूत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकच आहेत. ते शालेय जबाबदारी सांभाळून एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वर्षभर निवडणूक आयोगाच्या तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करतात. मतदार याद्या अद्ययावत करणे, नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांचे नाव वगळणे आदी कामे सतत सुरू असता. अशात आता ‘एसआयआर’साठी मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे.
शहरी भागात हे काम करणे अत्यंत क्लिष्ट व जिकरीचे आहे. या कामामुळे विविध राज्यांमध्ये ताण-तणावातून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी आत्महत्यादेखील केल्या आहेत. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी वरील मागणी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहरातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.








