IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात काही रोमहर्षक झुंजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः जसप्रीत बुमराह विरुद्ध साहिबजादा फरहान आणि उस्मान तारिक विरुद्ध हार्दिक पंड्या या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी झालेल्या स्पर्धेत अभिषेक शर्मा आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने अभिषेकला १९ चेंडू टाकले; त्यावर अभिषेकने ७ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे शाहीनला अद्याप अभिषेकला बाद करण्यात यश आलेले नाही.
दुसऱ्या बाजूला फरहानने बुमराहविरुद्ध ३४ चेंडूत ५१ धावा केल्या आहेत. मात्र बुमराहलाही त्याला बाद करता आलेले नाही. त्यामुळे नव्या चेंडूवरील ही झुंज निर्णायक ठरू शकते.
तसेच तिलक वर्मा आणि अबरार अहमद यांच्यातील सामना देखील रंगतदार ठरणार आहे. तिलकने २६ चेंडूत २३ धावा केल्या असून अबरारला त्याला बाद करता आलेले नाही.
याशिवाय सॅम अयुब आणि अर्शदीप सिंग यांच्यात डावाच्या सुरुवातीला चुरस होऊ शकते. फिरकीपटू उस्मान तारिक भारतीय फलंदाजांसाठी आव्हान उभे करू शकतो, विशेषतः हार्दिकविरुद्धची त्याची लढत सामन्याचा कल बदलू शकते.










