Jalgaon News : गावाचा विकास हा आमदार खासदावर मुख्यता अवलंबून नसून तो सरपंचांवर अवलंबून असतो. सरपंचांची मानसिकता आणि गावाच्या विकासाप्रति असलेली बांधिलकीतून खऱ्या अर्थाने गावाचा विकास होतो, असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्य मंत्री ना. रक्षा खडसे यांनी केले.
जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया चे हिमांशू पटेल यांचेसह इतर अधिकारी व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ना. रक्षा खडसे म्हणाल्या की, ग्रामसभेत गावाच्या विकासाचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. शासनाचा संपूर्ण पाठिंबा सरपंचांच्या पाठीशी आहे. सरपंच हा विकासाचा कणा आणि केंद्र आहे. या अशा प्रकारच्या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सरपंच सक्षम होण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीचा डेटा हा प्रत्येक सरपंचांजवळ असल्यास विकासाला बाधा येत नाही. हे सांगतानाच त्यांनी स्वतःचे उदाहरण देत त्यांचा सरपंच ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा प्रवास यावेळी विषद केला. या दोन दिवशीय प्रशिक्षणाला जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आमंत्रीत करण्यात आले आहे. या संवाद कार्यक्रमात ट्रेनर कविता वारे व सविता पांडे, विशाल चौधरी व सतीश उगले हे उपस्थित सरपंच व विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण देणार आहेत.








