मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या अंतर्गत येणाऱ्या भागात गुरुवारी, दि. १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असेल, अशी घोषणा केली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका आणि केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये ही सुट्टी पाळली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
तसेच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पुरेसे मतदान आणि मतमोजणी कर्मचारी नियुक्त करण्याचे आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक प्रशिक्षण वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलिस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा आणि सर्व २९ महानगरपालिकांचे आयुक्त, पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकही उपस्थित होते.
‘या’ 29 शहरांमध्ये होणार मतदान
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कश्मीर, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, आणि चंद्रपूरात मतदान होणार आहे.
आणखी आयोगाने काय म्हटले?
मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी, मतदान केंद्रांवर केलेल्या व्यवस्थेची सर्व कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी आणि मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर अखंड वीजपुरवठा, पिण्याचे पाणी आणि शौचालय सुविधा सुनिश्चित केल्या पाहिजेत, असे आयोगाने म्हटले आहे.









