Jalgaon News: राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या महा-रेशीम अभियान 2026 अंतर्गत तुती लागवड वाढवून रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत जनजागृतीसाठी रेशीम रथाच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या रेशीम रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, जिल्हा रेशीम अधिकारी राकेश जोशी, जळगाव तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी प्रत्येक तालुक्यात शिबिरे व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करून सुरू असलेल्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले. तसेच रेशीम शेतीचे महत्त्व, तुती लागवड वाढविणे आणि त्याद्वारे रेशीम उत्पादनात वाढ कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी यांनी रेशीम लागवड व संबंधित शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना रेशीम शेती, तुती लागवड तसेच उपलब्ध शासकीय योजनांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.








