Jalgaon News: गझल ही केवळ छंदाची मांडणी नसून ती कवीच्या संवेदनशीलतेची आणि भाषेवरील पकड याची कसोटी असते. त्यामुळे उत्तम काव्यदृष्टी, अनुभवाची खोली आणि शब्दावरील प्रभुत्व असलेला कवीच प्रभावी गझलकार होऊ शकतो. ‘गझल’ हा श्रोत्यांचा आवडता प्रकार आहे. परंतु गझलेचे व्याकरण समजून घेण्यासाठी वाचन आणि उत्तम गझलकारांचे सादरीकरण अनुभवणे आवश्यक आहे. असे मत गझलकार ज्ञानेश पाटील यांनी व्यक्त केले. ते मू. जे. महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘मी आणि माझी गझल’ या विषयावरील विशेष व्याख्यानप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी महाविद्यालयाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. भूपेंद्र केसूर होते. कार्यक्रमासाठी मराठी विभागप्रमुख प्रा. विद्या पाटील, डॉ. संगीता चंद्रात्रे, डॉ. जयश पाडवी, डॉ. योगेश महाले, डॉ. विलास धनवे, डॉ. मनोज महाजन, डॉ. राजीव पवार, प्रा. जितेंद्र मोरे, प्रा. गोपीचंद धनगर, डॉ. ज्ञानदेव सोनटक्के तसेच विविध विद्याशाखांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ज्ञानेश पाटील यांनी, गझल म्हणजे काय?, कविता आणि गझल यातील फरक सांगून फारसी, अरबी,उर्दू भाषेतील गझल, मराठीतील माधव ज्युलियन, सुरेश भट, बशीर बद्र, इलाही जमादार यांच्यापासून ते सतीश दराडे, वैभव देशमुख या गझलकारांच्या हिंदी, उर्दू आणि मराठी भाषेतील गझला सादर करून गझलेचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. २००५ पासून गझललेखन करीत आहे. या प्रवासात अनेक भाषांमधील गझलांनी मला प्रेरणा मिळाली. आजचा काळ तत्काळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी हापापलेल्यांचा काळ आहे. तत्काळ मिळणारी प्रसिद्धी दीर्घकाळ टिकणारी नसते. मात्र याचे भान आज अनेकांना नाही हे पाहतांना वाईट वाटते. कवितेचे मूल्य जपण्यासाठी प्रत्येकाने त्यातील गांभीर्य ओळखले पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या गझल लेखनाची सुरुवात आणि नंतरचा लेखन प्रवास सांगितला.
प्रा. भूपेंद्र केसूर यांनी अध्यक्षीय भाषणात, वाचनासोबतच ऐकणे हा गुण विद्यार्थ्यांनी आपल्यात रुजवला पाहिजे. तसेच मराठी भाषेचे जतन, संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम महाजन यांनी केले.









