Jalgaon News : जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण करणारी ही कारवाई असून वारंवार गुन्हेगारी कृत्यांमुळे शांतता भंग करणाऱ्या 6 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यात पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत असून या अंतर्गेत विविध पोलीस ठाण्यांकडून सराईत गुन्हेगारांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. या प्रस्तावांवर सुनावणी घेतल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 व 57 अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली.
6 सराईत जिल्ह्यातून हद्दपार
हद्दपार कारवाई अंतर्गत जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील सुनील पांडुरंग पारधी व विजय पांडुरंग पारधी, जळगावातील हरिविठ्ठल नगरातील अमोल ऊर्फ चिक्या शंकर कोकाटे, पिंप्रळा येथील महेंद्र ऊर्फ दादू समाधान सपकाळे, उमेश ऊर्फ उमाकांत दत्तात्रेय धोबी तसेच नशिराबाद येथील फिरोजशहा नूर शहा अशांवर कारवाई करत त्यांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे.









