Jalgaon News: जळगाव शहरापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या आरटीओ विभागाच्या वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि पक्के लायसन्स चाचणी ट्रॅकला अनेक समस्यांनी घेरले आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समस्या त्वरीत सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या ट्रॅकवर दररोज शेकडो वाहन चालक आणि नागरिक आपल्या कामासाठी येतात. मात्र, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. यासह या ठिकाणी शेडच आभाव आहे. चाचणीसाठी आलेल्या वाहनधारकांना ताटकळत उभे राहावे लागते. सावलीत बसण्याची कोणतीही ‘वेटिंग शेड’ उपलब्ध नाही. कडक उन्हात तासनतास उभे राहिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
तसेच महिला आणि पुरुषांसाठी या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. हा परिसर शहरापासून लांब असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा साध्या गरजांसाठीही नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागते.
प्रशासनाच्या या उदासीन कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी ट्रॅकवर त्वरित पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, नागरिकांना बसण्यासाठी प्रशस्त आणि सावलीची शेड उभारण्यात यावी, तातडीने फिरते किंवा कायमस्वरूपी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येत्या 8 दिवसांत या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, युसुफ खाटीक, अश्फाक शहा, आली खाटीक आदी उपस्थित होते.









