Jalgaon News: जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप कारवाई झाली नसून, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जळगाव तालुका प्रमुख प्रमोद घुगे यांनी केली.
निवेदनात असे म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आधीच वादळ, वारा,पावसामुळे मेटाकुटीस आलेला असून त्यात व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यात भर म्हणून की काय महायुतीच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोलिसांचा मार सुद्धा खावा लागत आहे. अशी घटना नुकतीच जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात घडली. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
यात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना जळगांव तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे यांनी दिला आहे.यावेळी धरणगाव शिवसेना तालुकाप्रमुख जयदीपबापू पाटील,अरुणदादा पाटील,प्रेमराज राठोड व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणी सत्ताधारी आणि इतर पक्षांनी मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.







