Nashik Kumbhmela Update : नाशिकचा आगामी कुंभमेळा निर्विघ्न आणि यशस्वीपणे कसा संपन्न होईल यावर चर्चेसाठी अखिल भारतीय संत समितीतर्फे नाशिकमध्ये येत्या ४ आणि ५ एप्रिलला तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिरात राष्ट्रीय संत समेलन होणार आहे, सामितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
कुंभमेळ्याच्या १३ आखाड्यातील प्रत्येक आखाड्याचे दोन प्रतिनिधी, १२७ संप्रदायांचे संत व प्रत्येक राज्यातील पाच ते दहा संत असे तीनशेच्यावर संत उपस्थित राहणार असल्याचे सांगून स्वामी जितेंद्रानंद म्हणाले की, राष्ट्रीय एकता आणि अखंडता हे या संमेलनातील महत्वाचे विषय असतील. संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. नाशिक ही तपोभूमी व रामभूमी आहे. नाशिकचा यंदाचा कुंभमेळा हा सर्वाधिक काळ चालणारा कुंभमेळा आहे. त्याचे यशस्वी आयोजन कसे करावे यावर परिषदेत प्रामुख्याने चर्चा होईल.
आखातीतील युध्दामुळे जगात अफरा-तफरीचे वातावरण आहे. भारतावर त्याचे परिणाम होत आहेत. जग तिसऱ्या महायुध्दाच्या उंबरठ्यावर आहे. सर्व जग व मानव जात संकटात आहे. अशावेळी संतांची जबाबदारी वाढली आहे. या सर्व गोष्टींवर तसेच देशापुढील समस्या, देशाची एकता व अखंडता यावर बैठकीत चर्चा होणार आहे. या संमेलनापूर्वी येत्या ३ एप्रिलला गंगा महासभा समिती नाशिकला येऊन गोदावरीच्या पाण्याचे परिक्षण करणार आहे.
गोदावरी शुध्दीकरणासाठी काय उपाय करता येईल याची सूचना समिती अहवालात करणार आहे. पर्यावरणाच्या नावाखाली काही जण कुंभमेळ्याला लक्ष्य करत आहेत याचा उल्लेख करून स्वामी जितेंद्रनंद सरस्वत्मी म्हणाले की, तपोवनातील झाडे तोडली नाही तर साधु-संत कोठे राहतील? पर्यावरणप्रेमींनी साधू-संतांबाबत आदराची भावना ठेवावी. तपोवनातील झाडे हटवून दुप्पट झाडे इतरत्र लावावीत. पुढील १२ वर्षांनी येणा-या कुंभमेळ्यासाठी सरकारने आताच पंधराशे एकर जागा खरेदी करावी यावेळी आचार्य तुषार भोसले, नगरसेवक कैलास मुदलीयार हे उपस्थित होते.






