Maharastra Waeather News: उकाड्याने हैराण झालेल्या राज्यतील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार असून हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. महिना संपण्यास अद्याप पंधरा दिवस बाकी असतांना उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे, असे असतांना हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने उन्हापासून काही काळ दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवस विजा आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा व विदर्भाला येलो अलर्ट दिला आहे.
यंदा मार्च महिन्यातच काही जिल्ह्यांचा पारा हा ४० अंश सेल्सियसच्यावर गेले आहे. जळगाव, विदर्भ अकोला तसेच राज्यात काही ठिकाणी ३९ व ४० वर पारा पोहचला आहे. उन्हाचे चटके असय्य होत आहे, उकाड्याने हैराण झालेले नागरिक रस, लस्सी व लिंबू शरबत आदी थंड पेयांचा आधार घेत आहे. मात्र भर दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उन्हात फिरणे टाळले जात आहे.
पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, तर सोमवारी गोवा,कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रामुख्याने, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे वातावरण ढगाळ राहणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.











