Jalgaon News: सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने रेल्वेला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने १४८४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या बडनेरा-नाशिक रोड विशेष गाड्यांचा समावेश असून यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वच मेमू, मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट गाड्या गर्दीने भरून येत आहेत. त्याने जळगाव व भुसावळ येथील प्रवाशांना जागा मिळणे कठीण होते, त्यात वेळेवर गाड्या येत नसल्याने काही वेळेला ताटकळत उभे रहावे लागत असे, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने १४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये बडनेरा– नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
या विशेष गाड्यांमुळे जळगाव – भुसावळकरांना हक्काच्या आणखी गाड्या प्रवासासाठी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्रवाशांना उन्हाळी सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची संधी मिळणार होणार आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या १४८४ उन्हाळी विशेष सेवांमध्ये ७४९ आरक्षित, तर ७३५ अनारक्षित गाड्या आहे. सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून वाढणारी मागणी लक्षात घेता विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार असून, प्रवाशांची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी काही नवीन विशेष गाड्याही चालविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुढील काळात आणखी गर्दी वाढणार असल्याने रेल्वेने प्रवाशांसाठी नियोजन केले आहे. राज्यातील इतर महत्वाच्या मार्गांवर विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये मुंबई/दौंड–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, नाशिक रोड–बडनेरा तसेच हडपसर–हरंगुळ या मार्गांवरील विशेष गाड्यांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्टीत प्रवाश्यांची गैरसोय टळणार आहे.






