Mumbai News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदे संदर्भात हा बातमी असून विधानसभेत एक महत्त्वाचे विधेयक पार पडले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या दुसरे सुधारणा विधेयक २०२६ विधानसभेत सर्वानुमते मंजूर झाले.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. या विधेयकानुसार, आता पालिका, नगरपालिका प्रमाणेच झेडपी आणि पंचायत समितीमध्ये स्थानिक पातळीवरील कला, संस्कृती क्षेत्रातील तज्ञ स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हा परिषदे मध्ये ही संख्या एकूण सदस्यांच्या २० टक्के तर पंचायत समितीमध्ये १० टक्के स्वीकृत सदस्यांना स्थान मिळणार आहे.
ग्रामीण भागातील लोकांना मिनी मंत्रालयात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनेकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये तिकीट नाकारले जाते, आशा नाराज लोकांना काम करण्याची संधी या माध्यमातून मिळेल. विधानसभेत या विधेयकाला अनेक सदस्यांनी पाठींबा दिला. याप्रसंगी नाना पटोले. विक्रम पाचपुते, प्रवीण स्वामी, प्रतापराव चिखलीकर, सुहास बाबर, राजकुमार बडोले, चंद्रदीप नरके, बाबासाहेब देशमुख, विठ्ठल लंघे, हरिष पिंपळे आदी सदस्यांनी या विधेयकाचे स्वागत केले.तसेच विरोधी पक्षातील सदस्यांनी या विधेेयकाला एकमताने पाठिंबा दिला. सरकारने विधानसभेत सर्वानुमते विधेयक मंजूर केले.











