Jalgaon News: सध्या पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. भारतातही याची झळ जाणवत आहे. देशात सर्वत्र घरगुती गॅसची टंचाई भासत आहे. जळगाव जिल्ह्यातही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके स्थापन करण्यात आले आहे.
शहरासह जिल्ह्यात गॅस टंचाईच्या तक्रारी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांची गॅससाठी वणवण सुरू आहे. काही ठिकाणी गॅस पुरवठादार एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा देखील दिसत आहे. एकीकडे ठराविक दिवसांच्या मुदतीनंतर गॅस नोंदणी करण्यास सांगितले जात असतानांच अशा प्रकारे प्रत्यक्ष नंबर लावून पुरवठादार गॅस देत असल्याने ही ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला तक्रारी प्राप्त होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून गॅसचा संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी तसेच निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे. सदर पथक घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर करडी नजर ठेवणार आहे. दरम्यान, नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.






