Mumbai News: वाढती बेरोजगारी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. काही वेळेस तरुणांकडून पैशाची मागणी केली जाते. तरुण पसे देतात, मात्र त्यानंतर नोकरी मिळाली नाही तर फसवणूक होते. हिंजवडी येथील असेच एका प्रकरण गाजत आहे. पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कमध्ये एक हजार पदवीधारकांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये १,००० फ्रेशर्स पदवीधारकांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याने पैसे परत मिळविण्यासाठी विशेष तपास पथकाची मागणी करण्यात आली आहे. तसेच आयटी क्षेत्रातील जबरदस्तीचे राजीनामे, कामावरून कमी करणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियम व आयटी कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याची लक्षवेधी सदस्य शंकर जगताप यांनी मांडली
त्यावर मंत्री. ॲड. फुंडकर यांनी लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले की, या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसेच, आयटी क्षेत्रातील जबरदस्तीचे राजीनामे, कामावरून कमी करणे यांसारख्या बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रथम कामगार विभागामार्फत सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. तो शक्य न झाल्यास प्रकरण कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालयात नेले जाते. याशिवाय केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार आयटी क्षेत्रासाठी स्वतंत्र ट्रिब्यूनल स्थापन करण्याची तरतूद असून, संबंधित नियम अंतिम झाल्यानंतर राज्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असेही मंत्री फुंडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.











