Weather Alert: जळगावत सध्या उष्णतेची लाट जाणवत आहे. जिल्ह्याच्या तापमाणात वाढ होताना दिसत आहे. अशात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जळगावसह काही जिल्ह्यांसाठी हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याचं तापमान 40 अंशांच्या जवळपास येवून ठेपले आहे. पुढच्या महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. अशात अवकाळी पावसाचे संकट देखील गडद होत असल्याची स्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात 14 आणि 15 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेची लाट आणि त्यानंतर अचानक पावसाची शक्यता यामुळे हवामानात मोठे चढउतार दिसून येत आहेत.
जळगावसह राज्याच्या इतर भागातही हवामानात बदल होत असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार, 13 ते 16 मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. 15 ते 16 मार्चदरम्यान विदर्भासह मराठवाडा तसेच धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जळगावाच्या तापमानात लक्षणिय वाढ नोंदविण्यात आली आहे. अशात आता राज्यावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खान्देश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.






