Dhule News: देवपुरातील रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्रांच्या खून प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी आरोपी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार, त्याचा पुत्र गौरव पवार, जयराज पाटील यांच्यासह ११ जणांना दुहेरी जन्मठेपेची, तर एका आरोपीस पाच वर्षाची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
देवपूर परिसरात आठ जून २०१८ रोजी पूर्ववैमनस्यातून रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील या पिता-पुत्रांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. उभय पक्षाचा युक्तिवाद,धुळे न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या समोर झाला. परिस्थितीजन्य पुरावे, नोंदविण्यात आलेल्या साक्ष, अशा सगळ्याच पातळीवरील नोंदी घेतल्यावर न्यायालय निष्कर्षाप्रती आले आणि १३ आरोपींपैकी ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धुळे न्यायालयात गुरुवारी या खटल्याचा निकाल असल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दुपारी साडेतीन वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली. सर्व आरोपींना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार, गौरव बाजीराव पवार, भूपेश वाल्मिक पाटील, हर्षल ऊर्फ दादू रविंद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, अर्जुन ऊर्फ आप्पा भगवान अहिरे, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे या ११ आरोपींना भादवि ३०२ अन्वये दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर तर संदीप ऊर्फ विक्की दिलीप वेळीस यास भा.दं.वि. कलम २१२ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा सुनावली. आरोपी संदीप वेळीस हा गेल्या साडेसात वर्षापासून तुरुंगात असल्याने त्याने पाच वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगली आहे.






