New Delhi : पश्चिम बंगालसह देशातील ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन केली. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू पुद्दुचेरी आणि केरल राज्यात निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची पत्रकार परिषद घेत घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहे, दि. २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. पाचही राज्यातील विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येत आहे.
पाच राज्याच्या निवडणुकीच्या तारखा पुढीलप्रमाणे आहे, केरळमध्येही १४० विधानसभा सदस्यांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ९ एप्रिल रोजी मतदान आणि ४ मे रोजी मतमोजणी आहे. आसाममध्ये सर्व १२५ मतदारसंघात एका टप्प्यात ९ एप्रिल रोजी मतदान आणि ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तामिळनाडूतील २३४ विधानसभेसाठी एका टप्प्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघासाठी दोन टप्प्यात १५२ आणि १४२ मतदारसंघात अनुक्रमे २३ आणि २९ एप्रिल मतदान होणार आहे. या सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी लागणार आहे.
गेल्या काही दिवसात निवडणूक आयोगाने सर्व राज्यांचा दौरा करून सर्व राजकीय पक्षांच्या भेटी घेऊन त्याचे मत जाणून घेतले. तसेच त्यांच्या असलेल्या सूचना ऐकून घेत, त्याप्रमाणे तयारीचा आढावा घेतला. सर्व राज्यातील निवडणूक यंत्रणा राबविणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, एसपी, आयजी, डीजी आदींची भेट घेतली. प्रशासनाने चांगले काम केल्याचे देशाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून पाच राज्यातील १७.४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे तर २५ लाख कर्मचारी कार्यरत राहणार आहे. देशात एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघात २.१९ लाख मतदान केंद्रांची संख्या आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.










