Jalgaon News: लाच खोरांच्या मुसक्या आवळण्यास लाचलुचपत विभागाने सुरुवात केली आहे. सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची कामे अडवून त्याच्याकडून लाच मागितली जाते, लाच न दिल्यास काम होत नाही, जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहे. लाकूड वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत ठेवून कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वनरक्षकाने फिर्यादीकडून ९ हजार रुपयांची लाच मागितल्याने या प्रकरणी यावल वन परिक्षेत्रातील वनरक्षकाविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हा आजूबाजूच्या परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे असलेल्या मालवाहू वाहनाने यावल तालुक्यातील पाडळसे, अंजाळे, तसेच आजूबाजूच्या परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याने आपल्या मालवाहू गाड्यांनी लाकूड वाहतूक सुरू राहावी, कोणतीही कारवाई होऊ नये,यासाठी यावल परिक्षेत्राचे वनरक्षक भैयासाहेब भीमराव गायकवाड (४३) यांनी दरमहा ९ हजार रुपये लाचेची मागणी केली.
मात्र, एवढी रक्कम देण्यासाठी नसल्याने फिर्यादीने जळगाव लाच लुचपत विभागाकडे २० मार्चला लेखी तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच दिवशी पडताळणी केली. लाकूड वाहतूक सुरळीत ठेवून कोणतीही कारवाई न करण्याकरिता वनरक्षक गायकवाड यांनी पंचांसमोर तक्रारदाराकडे ९ रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी त्याच्यावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.






