Jalgaon News: भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रक्रियेत उचित भरपाई व पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात उचित भरपाई आणि पारदर्शकतेवर भर द्या, अशा सूचना बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
संबंधित अधिनियम २०१३ मधील तरतुदींनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संपादित करण्यात येणाऱ्या खाजगी जमिनीवरील मालमत्ता, पिके, वनझाडे, फळझाडे, विहिरी तसेच इतर जलसंपत्ती यांचे अचूक व वास्तव मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध तांत्रिक विभागांकडून आवश्यक अभिप्राय घेऊन मूल्यांकन प्रक्रिया नियमबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
तसेच, विकास प्रकल्पांसाठी आवश्यक जमीन ताब्यात घेताना संबंधित भूधारकांना वेळेत व योग्य मोबदला मिळावा, यासाठी पुढील कार्यवाही गतीमान करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या. भूसंपादन अधिनियमातील तरतुदींचे काटेकोर पालन करत प्रकल्पग्रस्तांचे हित जपणे आणि विकासकामांना वेग देणे, हे बैठकीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील शेतकरी व भूधारकांच्या हक्कांचे संरक्षण करत त्यांना न्याय्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे देखील अधोरेखित करण्यात आले.






