Jalgoan News: शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस रात्री पाऊस पडत आहे, मात्र वातावरणातील उष्मा कायम आहे. दरम्यान जळगाव शहरातील इच्छादेवी मंदिराशेजारील फुकटपुरा झोपडपट्टी भागात गुरुवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुरुवातीला एका घरापुरती मर्यादित असलेली ही आग काही मिनिटांतच रौद्ररूप धारण करत शेजारील घरांमध्ये पसरली आणि पाहता पाहता तीन घरांना वेढा घातला. या आगीत तिन्ही कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंगार व्यवसाय करणारे आरिफ शेख हे आपल्या घरात झोपलेले असताना त्यांच्या घराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ घराबाहेर धाव घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करून शेजारील रफिक शेख आणि गंगाबाई मरसाळे यांच्या घरांनाही वेढा घातला. आगीच्या लाटा इतक्या तीव्र होत्या की काही मिनिटांतच तिन्ही घरांतील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. आपल्या डोळ्यांसमोर संसार जळताना पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली
दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, घरांमध्ये असलेले गॅस सिलिंडर वेळेवर बाहेर काढण्यात आल्याने मोठा स्फोट होण्याचा धोका टळला आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिसरात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रभावित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. सध्या या कुटुंबांना तातडीच्या मदतीची गरज असून, प्रशासॅन आणी स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याचे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.







