Delhi News: प्रकल्प 17-ए’ श्रेणीतील चौथी शक्तिशाली युद्धनौका असलेली ‘आयएनएस तारागिरी’ शुक्रवारी 3 एप्रिल 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. आधुनिक युध्दनौकाबांधणी क्षेत्रातील एक उत्कृष्ट नमुना असलेली ही अद्ययावत स्टेल्थ फ्रिगेट आहे, वजन अंदाजे 6,670 टन असून या युद्धनौकेची रचना ‘वॉरशिप डिझाइन ब्युरो’ने केली आहे.
‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सहकार्याने तिची बांधणी केली आहे. शत्रूच्या रडारवर सहजपणे दृष्टीस पडू शकणार नाही, अशा (कमी ‘रडार सिग्नेचर’ राखण्यासाठी) अतिप्रगत ‘स्टेल्थ तंत्रज्ञाना’चा वापर या युध्दनौकेच्या बांधणीसाठी करण्यात आला आहे. यामुळे संघर्षप्रवण वातावरणात या युद्धनौकेकडे शत्रूवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता आहे.
तारागिरीची बांधणी करताना 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा वापर केला असून, अत्यंत कमी कालावधीत तिची बांधण्यात आली आहे. ‘तारागिरी’ ही युद्धनौका, भारताचे नौकाबांधणी क्षेत्रातील नैपुण्य आणि सार्वजनिक-खाजगी क्षेत्रांमधील भक्कम सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या भाषणात संरक्षणमंत्र्यांनी ‘आयएनएस तारागिरी’चे वर्णन केवळ एक युद्धनौका म्हणून न करता, भारताची वाढती तांत्रिक क्षमता, आत्मनिर्भरता आणि नौदलाच्या अदम्य सामर्थ्याचे प्रतीक असे केले.










