Mumbai News: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी एक किमीपेक्षा अधिक अंतरातील शाळांचा पर्यायही पालकांना उपलब्ध करून देण्यातील तिढा आता सुटला आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एक किलोमीटर अंतरातील पालकांना प्रवेश घेण्याबाबतची अंतराची अट बेकायदेशीर असल्याचे सांगत यासंदर्भात आम आदमी पार्टी च्या ‘आप’ पालक युनियनने आंदोलन करून निवेदन दिले, तसेच ही अट काढण्याची मागणी शासनाकडे व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती.
याबाबतीत नागपूर खंडपीठाकडे जनहित याचिका व रिट पिटीशन आरटीई प्रवेशाचा बाबत दाखल करण्यात आली हाती. त्यानुसार ९ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या एक किलोमीटरच्या अटीस स्थगिती दिली होती. शासनाने स्वतःहून याबाबत सुधारित आदेश काढायला हवे होते, पण शासनाने नकारात्मक भूमिका घेतली होती. दरम्यानच्या काळात तीन किलोमीटर व त्यापुढील अंतराच्या संदर्भात कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनाला दिला. आता शासनाने एक किलोमीटरवरून तीन किलोमीटर व त्या पुढील अंतरासाठी पालकांना अर्ज करता येईल, असे सांगत माघार घेतली आहे. त्यामुळे आता पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पाच किलोमीटरमधील शाळांसाठी अर्ज करता येणार आहेत.











