Baramati News: रोहित पवारांनी २०२९ च्या बारामतीच्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना सांगितले की , २०२९ ची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार होऊ शकते. जय पवार विरोधात युगेंद्र पवार मैदानात उतरू शकतात असे ते म्हणाले, पवार विरुद्ध पवार लोकसभेला आणि विधानसभेला झाले आहे. त्यामुळे २०२९ ला देखील अशी लढत होऊ शकते. पवार विरुद्ध पवार लढत व्हावी ही लोकांची इच्छा नाही, मात्र काही जण पवार विरुद्ध पवार लढत झाली फिकजे यासाठी काम करत आहेत, असे रोहित पवारांनी यांनी म्हटले आहे. दरम्यान जय विरुद्ध युगेंद्र लढतीबाबत युगेंद्र यांनी स्पष्ट नकार देत आता पवार विरुद्ध नको असे सांगून रोहित पवार यांनी व्यक्त केलेली शक्यता फेटाळली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रकिया पार पडत आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि बारामतीकर यावेळी भरभरून मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विलीनीकरणाबाबतचचा प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले, जर अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले असते, तर २०२९ मध्ये दादा १०० टक्के राज्याचे मुख्यमंत्री झाले असते.
आज विलीनीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुढे रोहित पवार म्हणाले, अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचारासाठी का करत आहे, आमची दादांच्या प्रती काहीतरी जबाबदारी आहे. आज आपल्यात दादा नाहीत. त्यांचा अपघात कसा झाला? काय झालं? हे आम्ही शोधतच आहे. पण दादा नसताना त्यांच्याकडे बघून पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला. भावनिक दृष्टिकोनातून प्रचाराला येणे आम्हाला योग्य वाटले , त्यामुळे आम्ही प्रचार केला, पण आता विलीनीकरण होणार किंवा त्याची चर्चा होईल अशी चर्चा नाही, असे पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
दादांच्या निधनानंतर आता विलीनीकरणाचा प्रश्नच उरला नाही. दादा ही अशी व्यक्ती होती जी पुढाकार घेत होती, पण त्यांच्या पश्चात आता हा विषय चर्चेत नाही. ते म्हणाले सुनेत्रा काकींच्या प्रचाराला आलो, याचा अर्थ विलीनीकरण होणार असा होत नाही. हा सर्वस्वी एक भावनिक निर्णय असून दादांच्या प्रती असलेल्या आदरापोटी ते प्रचारात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर 2029 मध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी नाकारली नाही. जरी कौटुंबिक इच्छा एकत्र येण्याची असली, तरी राजकीय पक्ष आणि भूमिका वेगळ्या असल्याने संघर्ष होऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रोहित पवार म्हणाले, दादा बोलायला कडक आणि परखड होते, पण मनातून ते अत्यंत मवाळ आणि प्रेमळ होते. अधिवेशनामध्ये सुद्धा ते बोलण्याकडे, पेहरावाकडे ते बारकाईने लक्ष द्यायचे आणि टोमणेही मारायचे. दादांच्या प्रती असलेल्या आदरापोटी बारामतीकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदानासाठी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आणि कर्मचाऱ्यांचे मतदान झाल्याशिवाय त्यांना कामावर न घेण्याचा जो निर्णय व्यापारी संघटनेने घेतला, त्याचे त्यांनी स्वागत केले. तर मी २०१९ आणि २०२४ ला कर्जत-जामखेडमधून लढलो आहे आणि तिथेच राहणार आहे,” असे सांगत त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.









