Amalner News: खान्देशातील पारंपरिक सण-उत्सवांमध्ये विशेष स्थान असलेला आखाजी अर्थात अक्षय तृतीयेचा सण यंदा अमळनेर शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरा होणार आहे. अहिराणी वाङ्मय दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत खान्देश साहित्य संघाच्या वतीने प्रथमच भव्य आखाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता खान्देशी ओळख, परंपरा आणि भाषिक वारसा जपण्याचा व्यापक प्रयत्न ठरणार आहे.
यंदा आखाजी महोत्सव दि.17 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता एलआयसी कॉलनी परिसरातील खुल्या मैदानावर रंगणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी पारंपरिक सजावट, ग्रामीण वातावरणाची झलक आणि खान्देशी संस्कृतीची अनुभूती देणारी मांडणी करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून खान्देशातील लोकजीवन, रूढी-परंपरा, सण-उत्सव आणि विशेषतः अहिराणी भाषेचे जतन व संवर्धन करण्यावर भर देण्यात आला आहे. महोत्सवाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
ज्यामध्ये खा. स्मिता वाघ, आ. अनिल पाटील, माजी आ. कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर तसेच उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी राहणार असून, उद्घाटक म्हणून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून बाजार समितीचे सभापती अशोक पाटील जबाबदारी सांभाळतील
महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव
ग्रामीण संस्कृती आणि आखाजीच्या परंपरेवर मार्गदर्शन करण्यासाठी धुळे येथील अहिराणी लेखिका प्रा. डॉ. योगिता पाटील या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या भाषणातून खान्देशी परंपरेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सामाजिक महत्त्व आणि आधुनिक काळातील गरज यावर प्रकाश टाकला जाणार आहे. या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक लोककला आणि महिला वर्गाच्या सहभागाला दिलेले विशेष स्थान. महिलांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी खापरावरील पुरण पोळ्या बनविण्याची स्पर्धा ही पारंपरिक स्वयंपाक कलेचा वारसा जपणारी ठरणार आहे. झोक्यावर गायली जाणारी अहिराणी गीते, गौराईची पारंपरिक गाणी आणि जात्यावरील गाण्यांच्या स्पर्धा यामुळे ग्रामीण संस्कृतीचे जीवंत चित्र आखाजी महोत्सवात उभे राहणार आहे.
विजेत्यांना रोख बक्षीसे, प्रमाणपत्र
याशिवाय, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि एक मिनिटात उखाणे या स्पर्धांमुळे महिलांना आपली कला आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी 5 हजार रुपये, द्वितीयसाठी 3 हजार रुपये आणि तृतीयसाठी 2 हजार रुपये तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.‘गौराई’ या सन्मानचिन्हाद्वारे विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. महोत्सवात ‘अहिराणी शब्द व संस्कृती’ या विषयावर आधारित चालता-बोलता प्रश्नमंजुषा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये आपल्या मातृभाषेबद्दल आणि सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.








