Bhusaval News: भुसावळ रेल्वे विभागाने फुकट्या प्रवाश्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनातिकीट व अनधिकृत प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी “विशेष तिकीट तपासणी अभियान” राबविले जात आहे. या विशेष अभियानांतर्गत नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, जळगाव, खंडवा, अकोला, बडनेरा व अमरावती या प्रमुख स्थानकांचा समावेश होता. अभियाना दरम्यान एकूण ७८२ प्रकरणांमध्ये कारवाई करून पाच कोटी ८६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, रेल्वे कायद्याच्या कलम १४५ ब आणि १६७ अंतर्गत एकूण सात प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्यातूनही दंड वसूल करण्यात आला आहे.
विनातिकीट प्रवास करण्याऱ्या प्रवाश्याना नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अधिकृत तिकीट काढून प्रवास करणे याचे महत्त्व पटवून देणे या.अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानात ५८ तिकीट तपासणी कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणा-या चार विक्रेत्यांविरूद्ध कारवाई करून त्यांच्यावर प्रकरणे दाखल करण्यात आली. प्रवाशांनी योग्य व वैध तिकीट घेऊनच सन्मानपूर्वक प्रवास करावा, दंड टाळवा असे आवाहन रेल्वेने केले आहे.
सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे रेल्वेच्या अतिरिक्त सेवा देण्यात येत आहेत. अतिरिक्त सोडण्यात आलेल्या गाडयांना प्रवाश्यांची खचाखच गर्दी दिसत आहे. बऱ्याच वेळा प्रवाशी गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करतात त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिमाण होते. अशा फुकट्या प्रवाश्यांवर रेल्वेची वक्रदृष्टी पडली असून रेल्वेतर्फे अशा प्रवाश्यांकडून दंड वसूल केला जात आहे.






