Jalgaon News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी शेतकरी हिताची आहे. जळगाव जिल्ह्यात 81 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तर 1 लाख 53 हजार 409 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळेल, असे मत जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केले आहे.
संजय पवार म्हणाले की, राज्याचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प अजित पवार यांनीच मांडला असता परंतु दुदैवाने त्यांचे अपघातात निधन झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अगोदरच तरतूद करून ठेवली होती. त्यांनीच ही घोषणाही केली असती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. खऱ्या अर्थाने हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले आहे. जिल्हा बँकेत 1 लाख 53 हजार 409 शेतकरी नियमित कर्ज घेवून त्याची फेड करणारे आहेत. त्यांना 50 हजार रूपयांचा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार आहे. अशी माहितीही अध्यक्ष संजय पवार यांनी दिली.
बँकेला 410 कोटी रुपये रक्कम अपेक्षित
जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत संजय पवार यांनी सांगितले की, जिल्ह्यात 81 हजार 394 शेतकऱ्यांना दोन लाखपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांकडे 273 कोटी 27 लाख रूपये थकित आहेत. त्यावरील व्याज 137 कोटी 1 लाख रूपये असे एकूण 410 कोटी रूपयाची रक्कम होत आहे. शासनाच्या कर्जमाफी धोरणानुसार मार्च अखेर जिल्हा बँकेला 410 कोटी रूपये रक्कम अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज झालेले असेल. त्यांना 2 लाखांच्या पुढील रक्कम भरावी लागणार आहे.










