Pune News: वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वारकरी ज्या गोष्टीची अतुरतेने वाट पाहता ती पंढरीची वारी लवकरच होत आहे. विठ्ठल भेटीच्या ओढीने वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे लाखो वारकरी, हजारो दिंड्या आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्या आपल्या वारीचं नियोजन करत असतात. यंदा आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी होत असल्याने आत्तापासूनच पंढरीच्या वारीचं नियोजन केलं जात आहे. त्यातच, संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या वेळापत्रकानुसार, यंदा 7 जुलैपासून तुकोबांची पालखी पंढरीकडे प्रस्थान करणार आहे.
जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जेष्ठ वद्य सप्तमी, मंगळवार 7 जुलै 2026 रोजी श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य देऊळवाड्यातून संत तुकाराम महाराजांची पालखी भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा गजर करत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी संस्थानतर्फे तीन बैलजोड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या यंदाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. तुकोबारायांच्या पालखीसह संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचीही उत्सुकता वारकरी आणि विठ्ठलभक्तांना असते. त्यामुळे, आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून पंढरीकडे कधी प्रस्थान होणार हेही लवकरच समजणार आहे.
दरम्यान, पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या आणि शेकडो पालख्या येत असतात. त्यामध्ये, जळगावमधून संत मुक्ताई, बुलढाण्यातून संत गजानन महाराजांच्या पालखीचेही प्रस्थान होत असते. गजानन महाराजांची पालखी शेगाव ते पंढरी वारकऱ्यांसह पायी प्रवास करते. त्यामध्ये, हत्ती, घोडा, पालखीसह वारकरी माऊली माऊली.. चा गजर करताना दिसून येतात.










