Amalner News: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा तीव्र होत असून वाढत्या उष्णतेमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील एकतास येथील विश्वास नारायण पाटील (वय ४४) हे दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करून घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांनी पाणी पिऊन कुलरसमोर विश्रांती घेत असताना अचानक त्यांना झटका येऊन उलट्या सुरू झाल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश शिंदे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, सिंधुबाई रमेश बागुल (वय ६९, रा. निमगूळ ता. शिंदखेडा) या अमळनेर येथे नातेवाईकांच्या मेहंदी कार्यक्रमासाठी रेल्वेने येत होत्या. दि. १२ रोजी सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरात त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या.एलआयसीचे अधिकारी आर. बी. पाटील यांनी त्यांना रिक्षाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. महिलेला तीव्र ताप असल्याने उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.

याशिवाय एलआयसी कॉलनीतील रहिवासी रमेश जगन्नाथ चौधरी हे लग्न समारंभासाठी बाहेर गेल्यानंतर उष्णतेमुळे आजारी पडले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. तसेच ढेकू येथील शंकर आनंदा पाटील यांचाही उष्णतेच्या तीव्रतेमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान अमळनेरमध्ये आणखी एका घटना घडली असून भादरवाडी बद्रीनाथ मंदिराचे पुजारी श्रीहरी प्रभाकर दीक्षित (वय ७०) यांचे उष्माघाताने मृत्यू झाल्याचे प्राथामिक तपासात समोर आले आहे.
देवगाव देवळी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
तालुक्यातील देवगाव देवळी येथे अनिल मंगल शिरसाठ (वय ३५) यांनी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. मयत अनिल शिरसाठ यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.






