Nashik News: आगर टाकळीतील घरांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करू नये, अशी मागणी प्रभाग १६ मधील संघर्ष समितीतर्फे नगरसेवक राहुल दिवे व भीमटोला सामाजिक संघटनेचे अनिल गांगुर्डे यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे शहर अभियंते संजय अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा – आगर टाकळी गावठाणमध्ये येणारी व सिटी सर्व्हेचे दाखले असलेली काही घरे रस्ता रुंदीकरणात अडथळे होत असल्याचे कारण देऊन अतिक्रमण विभागाने घरे रिकामी करण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. घरांवर बुलडोझर फिरणार असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विकास कामाला आमचा विरोध नाही. परंतु, घरे तोडून विकास कसा साध्य होणार? घरमालकांनी अतिक्रमण केलेले सर्व साहित्य काढून घेतले असून भविष्यात असे अतिक्रमण होणार नाही, असे नागरिकांनी शहर अभियंता अग्रवाल यांना सांगितले आहे.
ज्यांनी अतिक्रमण केले असेल ते काढण्यास आमची काहीही हरकत नाही. निवेदन देते वेळी प्रशांत गांगुर्डे, लखन पगारे, बाबासाहेब पवार, योगीता साळवे, अजंली साळवे, मनिषा नटावटे, रईसा शेख,माधुरी नटावटे, उज्वला जाधव, कविता शिंदे, मालती साळवे, अंबादास लोखंडे, सुनिल नेटावटे, राजेंद्र जाधव, रवी शिंदे, देवेंद्र नेटावटे, पवन भालेराव, अजय दिवे, हुसेन शेख, मनिष डांगे आदी उपस्थित होते.
दरम्यान अगरतकाळी हा भाग रामदास स्वामी मठाच्या परिसरात येतो, याठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनेक वर्षांपासून लोक वसती करून राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाश्याना अचानक नोटीसा आल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.






