Jalgaon News: भारतीय रेल्वेने आपल्या प्रादेशिक वाहतूक सेवेचा विस्तार करत, महाराष्ट्राला मध्य प्रदेशमार्गे उत्तरप्रदेशशी जोडणाऱ्या दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. दररोज धावणारी बनारस-हडपसर (पुणे) आणि आठवड्यातून एकदा धावणारी नाशिकरोडमार्गे अयोध्या-मुंबई यांचा यात समावेश आहे. यातील अयोध्या- एलटीटी गाडी नाशिकरोडसह जळगाव आणि भुसावळ या स्थानकावर देखील थांबणार आहे. उन्हाळ्याची गर्दी लक्षात घेऊन या नव्या कोऱ्या गाड्यांचा फायदा प्रवाश्याना होणार आहे.
बनारस-हडपसर(पुणे) गाडीमुळे काशी विश्वनाथ धामला जाण्याची सोय होऊ शकेल. तर अयोध्या-एलटीटी मुंबई गाडी श्री राम मंदिर तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी उपयुक्त ठरेल. दैनंदिन प्रवासी, स्थलांतरित मंजूर आणि महाराष्ट्र व उत्तरप्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या भाविकांना या गाड्यांचा मोठा लाभ होणार आहे. थेट संपर्कामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि गाड्या बदलण्याची गरजही उरणार नाही.
अयोध्या कॅन्ट – मुंबई अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या कॅन्ट येथून १६.४५ वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी २०.३० वाजता मुंबई एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे पुढीलप्रमाणे आहे, अयोध्या धाम, सुलतानपूर, माँ बेल्हा देवी धाम, प्रतापगढ, प्रयागराज, मानिकपूर, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, ठाणे व लोकमान्य टिळक टर्मिनस असा गाडीचा प्रवास राहील.
नाशिक रोड – आगमन १६.१० वाजता, प्रस्थान १६.१५ वाजता.
गाडी क्रमांक (02531) बनारस – पुणे अमृत भारत एक्सप्रेस बनारस येथून १६.४५ वाजता सुटेल आणि तिस-या दिवशी ००.५५ वाजता पुणे हडपसर येथे पोहोचेल. थांबे असे आहेत, ज्ञानपूर रोड, प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी, उरई, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, बीना, राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन व हडपसर. तसेच मनमाड – आगमन १७.४५ वाजता, प्रस्थान १७.५० वाजता होईल.
अमृत भारत एक्सप्रेसची रचना अशी आहे
१ सामान्य श्रेणीचे डबे, ८ स्लीपर श्रेणीचे डबे, २ दिव्यांग व लगेज-गार्डयुक्त डबे असतील. अमृत भारत गाड्या पूर्णपणे बिगर- वातानुकुलित, अत्याधुनिक सेवा असलेल्या आणि सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सुविधांवर भर देणा-या आहेत. या गाड्यांमध्ये सामान्य, आणि सामान्य शयन श्रेणी डबे असून, त्यात खानपान सेवा आणि दिव्यांग स्नेही सुविधाही आहेत. नव्या प्रकारच्या आसन आणि शयन व्यवस्था वंदे भारतप्रमाणे आहेत. तसेच, त्यात धक्के लागू नयेत असे सेमी- स्वयंचलित कपलर्स, आणि अपघाताच्या वेळी सुरक्षा देणारी उच्च सुरक्षा मानके यांचा समावेश असेल. या गाड्या सीसीटीव्ही देखरेखीखाली असतील, तसेच त्या आपत्कालीन टॉक-बॅक प्रणाली, एरोसोल-आधारित अग्निशमन व्यवस्था आणि पूर्णतः सीलबंद गँगवे यांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत. या दोन्ही गाड्या पुश-पुल तंत्रज्ञानावर आधारित असून, वेग वाढवण्यासाठी गाडीच्या दोन्ही टोकांना लोकोमोटिव्ह लावण्यात आले आहेत.






