Jalgaon News: राज्यात दि.३ ते ६ मे दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पिकांची काळजी घ्यावी, जेणे करून नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही.
हवामान विभागाच्या कुलाबा, मुंबई केंद्राने शेतकऱ्यांसाठी हवामान बुलेटिन जारी केले आहे. त्यामध्ये गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्राला लागू असलेला अंदाज वर्तविला आहे. शनिवार, २ मे ते ०७ मे २०२६ च्या सकाळपर्यंत हवामानाचा अंदाज लागू राहणार आहे, दि. ०२ ते ०३ मे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. ०४ ‘मे’ला विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
दि.०५ ते ०६ मे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कोकण व गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा इशारा दिला आहे. दि.२ मे रोजी हवामान निल राहील. दि.३ ते ६ ‘मे’ला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे, असा अंदाज दिला आहे.
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.











