Jalgaon News: वरणगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने नुकतीच जुन्या नगरपरिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मूक पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली, यात युवक युवतींचा मोठा सहभाग होता. गेल्या १८ फेब्रुवारी पासून बलिदान मास पाळण्यात आला होता. बलिदान मासात तरुणांमधील नैराश्य कमी करणे व व्यसनमुक्तीचा उद्देश यावर्षी बलिदानमासानिमित्त तरुणांनी ठेवला होता.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना ४० दिवस कैदेत ठेवले होते. त्याचा निषेध व महाराजांच्या धैर्याचे समर्थन म्हणून १८ मार्च बलिदान दिवस पाळला जातो. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी पूर्वी चाळीस दिवसांचा कालावधी हा बलिदान मास म्हणून पाळला जातो. या कालावधीत दररोज ८ वाजता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री संभाजी सूर्यहृदय श्लोक म्हणतात. दररोज रात्री ८ वाजेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शंभरावर तरुण, तरुणी दररोज रात्री सहभागी झाले होते. युवक- युवतीसह धारकरी महिनाभर गोड पदार्थ त्याग करतात, चपलाही घालत नाही.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ४० दिवस वेदना देऊन त्यांची हत्या केली. हिंदुत्व व स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलेल्या वेदनांची जाणीव राहावी, यासाठी बलिदान मास पाळला जातो. या महिन्यात आवडीच्या वस्तू, गोड पदार्थांचा त्याग केला जातो. पायात चप्पल घातली जात नाही, डोक्यावरचे केस काढून मुंडन करून जमिनीवर झोपायचे, संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळला जातो. अशा कृतीतून श्रद्धांजली व बलिदान मास म्हणून तरुण तसेच शालेय विद्यार्थी, युवक, युवती, महिलांसह धारकरी यामध्ये बलिदान मासात सहभागी झाले होते. तसेच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी बुला १८ मार्चला वरणगाव नगरपरिषद येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणूक मार्गाने भवानी माता मंदिर, जुनी पोस्ट गल्ली, मोठी होळी, चौधरी वाडा, बढे वाडा, मोठा माळी वाडा या मार्गाने मुकपदायात्रा काढून गांधी चौक या ठिकाणी मूक पदयात्रेचा समारोप करून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर गौरव राजेंद्र माळी यांनी मनोगत व्यक्त केले.
मूक पदयात्रेचे गौरव माळी, गोलू माळी, महेश सोनवणे, मनीष झांबरे, निखिल चौधरी, किरण धनगर, पप्पू माळी, सोनु निंबाळकर, मनोज देवगिरकर, मनोज माळी यांनी नियोजन केले. तर शिवबा मित्र मंडळ, सह्याद्री मंडळ, मजदुर मंडळ यांचे कार्यकर्ते सहभागी झाले.शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, नगरसेवक राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक गणेश धनगर, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, राजेंद्र त्र्यंबक माळी, बापू माळी, किरण माळी, राजू देवगिरीकर, मनोज देशमुख यांच्यासह अनेकांनी गांधी चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.





