Maharastra Kesari: महाराष्ट्रातील महत्त्वाचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी महेंद्र गायकवाड याचा चित्तथरारक लढतीत प्रभाव करून महाराष्ट्र केसरी पदावर नाव कोरले. त्याच्या विजयाने नाशिकमधील भगुर येथे चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्याच्या विजयानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्याचे अभिनंदन केले.
त्या म्हणाल्या की, सद्गिर याने आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून कुस्ती रसिकांची मने जिंकली आहेत, असे बोलून त्यांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाल्या की, वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा थरार अनुभवायला मिळाला असल्याचे सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या कुस्ती स्पर्धेकडे होते. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर यांनी दमदार खेळ केला आणि मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. अंतिम सामन्यातील हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांची झुंज ही खऱ्या अर्थाने कुस्ती परंपरेची मान उंचावणारी ठरली. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, परंपरेचा ठेवा असलेला रांगडा क्रीडाप्रकार आहे, कुस्तीच्या माध्यमातूनच पै. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिली.
वाघोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत अनेक रोमांचक आणि चुरशीचे सामने रंगले. भव्य आणि उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धेला विशेष उठाव प्राप्त झाला. या स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





