Mumbai News: (Monsoon Update) राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला आहे. उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे जीव कासावीस झाला आहे, त्यामुळे नागरिक थंड पदार्थ आणि शीत पेयांना पसंती देत आहे. त्यात लिंबू शरबत, लस्सी, वेगवेगळ्या फळांचे जूस याचा सहारा घेत आहे. आता नागिरकांना दिलासा देणारी बातमी आहे, आता उकाड्यापासून दोन दिवस सुटका होणार आहे. सध्या राज्यातील काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. खान्देशच्या शेतकऱ्यांनी आपली पिके वाचवावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दि. ३० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही.दि.३१ मार्च रोजी देखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.
शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.






