Jalgaon News: गॅस पुरवठा अडथळ्यानंतर आता तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जामनेर शहरात गॅस सिलिंडर वितरणात अडचणी येत आहे, अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे ग्राहक संभ्रमात आहे. त्यात नव नवे नियम लावल्याने ग्राहक बेजार झाले आहे. त्यातच एवढे करून देखील गॅस सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर निदर्शने केली. यावेळी ग्राहकांनी संताप व्यक्त करून भुसावळ छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आक्रमक झालेल्या आंदोलकांमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली.
दरम्यान वितरण कंपन्यांनी अलीकडेच गॅस पूरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन नियम आणला आहे. भारत गॅस कंपनीने अलीकडेच सिलिंडर वितरणाबाबत नवीन धोरण लागू करतांना, या धोरणानुसार गॅस एजन्सींना थेट बुकिंग स्वीकारण्याचे अधिकार काढून घेतले आहे. आता ग्राहकांना आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून गॅसची बुकिंग करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गॅस आल्यावर नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येतो तो टाकल्यावर गॅस सिलेंडरची प्रक्रिया पूर्ण होते.
नव्या नियमाची माहिती गॅस ग्राहकांना नसल्याने ते संभ्रमात पडतात. ओटीपी येत नसल्याने ग्राहकांना सिलेंडर मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. अनेक ग्राहक गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गर्दी वाढून गोंधळ निर्माण झाला ग्राहकांना ऑनलाईन प्रक्रिया आणि ओटीपीची माहिती नसल्याने गॅस कंपनी कर्मचाऱ्यांशी भांडणे होत आहेत. जामनेरमध्ये असाच प्रकार घडल्याने संतप्त नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर निदर्शने केली तसेच थेट रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
नागरिकांचा रास्ता रोको
दरम्यान ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तासंतास ताटकळत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी एजन्सीसमोर जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला, तसेच भुसावळ- छत्रपती संभाजीनगर मार्गावर रिकामे गॅस सिलिंडर रस्त्यावर टाकून रास्ता रोको केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे प्रवाश्यांना अडचणीचा सामना करावा लागला, दरम्यान ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस नोंदणी केल्यावर ४५ दिवसांनी गॅस मिळतो तर शहरी भागात २५ दिवसांनी गॅस सिलिंडर मिळणार आहे, नव्या नियमाची माहिती ग्राहकांना वेळेवर न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त करत नाराजी दर्शवली.





