Tatkal Ticket New Rules : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी तत्काळ तिकीट प्रणालीत मोठे बदल केले आहेत. या नव्या बदलांचा उद्देश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित बनवणे हा आहे. नवीन नियमांनुसार तत्काळ तिकिटे फक्त पूर्णपणे सत्यापित आयआरसीटीसी खात्यांमधूनच बुक करता येणार आहेत. यामुळे प्रवाशांना आता त्यांचे आयआरसीटीसी खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे.
अपूर्ण प्रोफाईल असलेली खाती होतील ब्लॉक
पडताळणीशिवाय किंवा अपूर्ण प्रोफाईल असलेली खाती तत्काळ विंडो दरम्यान ब्लॉक केली जातील. प्रवाशांना बुकिंगच्या वेळी फक्त त्यांच्या आधार किंवा सरकारी आयडीशी लिंक केलेले ओळखपत्र तपशील प्रदान करणे आवश्यक असेल. यामुळे बनावट नावांनी तिकिटे बुक करणे आणि त्यांना महागड्या दरात विकणे या पद्धतीला आळा बसेल.
बुकिंगच्या सुरुवातीच्या मिनिटांत ऑटो-फिल टुल्स आणि स्क्रिप्ट ब्लॉक करण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक फिल्टर लागू करण्यात आले आहेत. यामुळे, आता सॉफ्टवेअरद्वारे क्षणार्धात तिकीट मिळवणे शक्य होणार नाही.
पेमेंट फेल होणे ही प्रवाशांची मोठी तक्रार होती. नवीन प्रणाली पेमेंट गेट-वे जलद आणि अधिक सुरक्षित बनवते. यामुळे शेवटच्या टप्प्यावर तिकीट रद्द होण्याचा धोका कमी होतो. तत्काळ विंडो उघडण्याच्या सुरुवातीच्या काळात एजंटच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. सामान्य लोकांना प्राधान्य देण्यासाठी त्यांच्यासाठी नवीन निर्बंध आणि ट्रॅकिंग साधने लागू करण्यात आली आहेत.









