जळगाव : नांदगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना हिरापूर गावानजीक घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
काही मिनिटावर घर आले असतानाच हिरापूर येथे हा अपघात झाला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील सोमनाथ संजय वराडे (३२), सागर संजय वराडे (२६) व त्यांचा मित्र विकी बापुराव खैरनार (३०) हे तिघे रात्री ९:३० वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच०५/झेड८९०९) तळेगावकडून हिरापूरकडे येत असताना चाळीसगावकडून नांदगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने (एमएच०४/एचवाय७२०८) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच हिरापूर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून तिघांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिघांना मृत घोषित केले.
अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल
हा अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावर वाहनांच्या तुटलेल्या काचा, तुकडे व रक्ताचा सडा पडलेला होता. दरम्यान, अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध राजेंद्र रामभाऊ वराडे (बजाजनगर, मालेगाव रोड, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









