जळगाव : फेब्रुवारी महिना अर्ध्यावर येण्यापूर्वीच जळगाव शहरासह जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने वाढ होत असून, रात्रीचा गारठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
गुरुवारी जळगावचे किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर कमाल तापमान ३३.४ अंशांवर पोहोचले. गेल्या वर्षी याच कालावधीत कमाल तापमान सुमारे ३२ अंशांच्या आसपास होते. मात्र यंदा तापमानाने ३३ अंशांचा टप्पा ओलांडल्याने दुपारी घराबाहेर पडणे कठीण होत आहे.
सामान्यतः मार्चच्या उत्तरार्धात जाणवणारी उष्णता यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जाणवू लागली आहे. सकाळी आणि रात्री हलकी थंडी असली तरी दुपारच्या सत्रात सूर्याचा कडाका वाढत आहे. गेल्या सहा दिवसांतील नोंदींनुसार कमाल तापमान सातत्याने ३३ अंशांच्या पुढे राहिले आहे.
दुपारच्या उन्हात बाहेर पडा, पण…
दरम्यान, हवेत आर्द्रता कमी झाल्यामुळे कोरडेपणा वाढला असून उष्णतेची तीव्रता अधिक भासत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी ‘शौर्य मराठी’च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)










