America Iran War: अमेरीका आणि इराण यांच्या युद्धाकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागून आहे. कारण, या युद्धाचे परिणाम हळूहळू संपुर्ण जगावर दिसू लागले आहे. या युद्धाचा फटका अप्रत्यक्षरिता आता जळगाव जिल्ह्याला बसू लागला आहे. अमेरिका व इराण यांच्यातील युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. या युद्धामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती निर्माण झाली असून केळीची निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
केळी निर्यात रखडली
जळगाव जिल्हा केळी उत्पदनाबाबत जगात प्रसिद्ध आहे. जळगावच्या केळीला जगभरातून मागणी असते. त्यात सध्या रमजान महिना सुरु असल्याने केळीला मोठी मागणी आहे. मात्र, अमेरीका-इराण युद्धामुळे जळगावचा केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सपडला आहे. कारण, जळगाव जिल्ह्यातून दररोज सुमारे 12 कंटेनर केळी आखाती देशांकडे पाठवली जात होती. रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशात केळीसह इतरही फळांना मोठी मागणी आहे. मात्र, युद्धजन्य परस्थितीमुळे निर्यात रखडली आहे.
इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातून केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने आखाती देशांबरोबरच मुस्लिम देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळीची जळगाव जिल्ह्यातून निर्यात होत असते. एकीकडे केळीची निर्यात ठप्प झाली असून दुसरीकडे केळीच्या दरात देखील मोठी घट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. युद्धापूर्वी केळीचा दर 2500 रुपये क्विंटल एवढा होता. मात्र, त्यात आता घट झाल्याने केवळ 1500 रुपये क्विंटल एवढाच दर केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.










