Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात सध्या वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एका सत्रात भरणाऱ्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दि. ३० जून २०२६ पर्यंत सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० या वेळेत भरविण्याबाबत आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी जळगाव माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे करण्यात आली.
याबाबत समितीने अप्पर जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनाचा आशय असा, जळगाव जिल्ह्यात दि. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला असला तरी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व पंख्यांची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता, उपस्थिती व अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे.

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून जिल्ह्यातील एका सत्रात भरणाऱ्या सर्व शाळांची वेळ तात्पुरत्या स्वरूपात सकाळी ७.०० ते दुपारी १२.०० अशी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष गिरीश नेमाडे, कार्याध्यक्ष प्रकाश आनंदा पाटील, समन्वयक तथा संचालक तुळशीराम सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, पी. एस. सोनवणे, संतोष कचरे, शशिकांत राणेराजपूत, बाजगीर सर, उपाध्यक्ष गोविंदा पाटील, सुनील वानखेडे, सुरेश अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान निवेदनाची प्रत शिक्षक आमदार किशोर दराडे, पदवीधर आमदार सत्यजित तांबे तसेच जळगाव शिक्षणाधिकारी (माध्यमिक), यांना माहितीस्तव देण्यात आली आहे. असे समितेने सांगितले.






