Nashik News: शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवबंधन सोडून शिंदे सेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचे निश्चित केले असताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे पक्षासोबत एकनिष्ठ राहिले. त्यांची एकनिष्ठता बघून दिल्लीच्या राजकीय आणि माध्यमांमध्ये ही “ये राजाभाऊ कोण है” अशी चर्चा आहे. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनी आणि सोशल माध्यमातून खासदार राजाभाऊ वाजे यांनी दाखवलेल्या एकनिष्ठेतेला सलाम ठोकला. शुक्रवारी सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून घोषणाबाजी करत स्वागत केले. त्यानंतर वाजे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
ठाकरे गटाच्या खासदारांनी बंडाळीचे निशाण फडकविले. तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर खासदार वाजे शुक्रवारी रेल्वे स्थानकावर रेल्वेने आले. कार्यकर्त्यांचे जोरदार स्वागत केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देवळाली गाव शिवसेना शाखेच्या ५८ व्या व शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम झाला.

शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, नगरसेवक योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे, मंगला आढाव, संजीवनी हांडोरे, रुचिरा साळवे, वैशाली दाणी, अस्लम मणियार, स्वप्निल औटे, शेखर पवार, योगेश देशमुख, किरण डहाळे, चंदू महानुभाव, योगेश शिंदे, सागर निकाळे, राजू मोरे, संजय गायकवाड, विकास गीते, योगेश नागरे, राहुल ताजनपुरे, पंकज सोनवणे, महिला जिल्हा संघटक स्वाती पाटील, मंदा गवळी, योगिता गायकवाड, अश्विनी माने आदी उपस्थित होते.
वडिलांची शाबाकीची थाप
फुलांचा वर्षाव आणि ढोल ताशांचा गजर..अन् तुफान घोषणाबाजी, अशा उत्साहपूर्ण वातावरणात ठाकरे सेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत करण्यात आलं. शिंदे सेनेनं राबवलेल्या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटले. दिल्लीत दोन तीन दिवस मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. राज्यातील परिस्थितीही तणावाची झाली होती..वाजे यांनाही ऑफर देण्यात आली होती. पण, त्यांनी ती नाकारून ठाकरे सेनेतच राहण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिल्लीहून परतल्यावर रेल्वे स्टेशनवर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. खाली उतरताच त्यांचं औक्षण करण्यात आलं. दरम्यान वाजे घरी पोहचताच त्यांनी वडिलांचा आशीर्वाद घेतला यावेळी त्यांच्या वडिलांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली. राजाभाऊ भावूक झाले होते.










